लोणी काळभोर येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप ; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

लोणी काळभोर, (ता. हवेली) : दि.३ ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गवळी होते, तर महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश (दादा) बागवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत शिक्षण, संस्कार, सामाजिक जबाबदारी आणि महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचा संघर्षमय जीवनप्रवास आणि त्यांच्या साहित्याचा समाजावर झालेला प्रभाव विद्यार्थ्यांसमोर उलगडला.
या कार्यक्रमाचे आयोजन मातंग एकता आंदोलनाचे पुणे जिल्हाध्यक्ष दिगंबर जोगदंड आणि जिल्हा परिषद सदस्या शितल सुजित कांबळे यांनी केले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भविष्यातही परिश्रम, शिस्त आणि गुणवत्तेच्या बळावर यश मिळविण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर अन्यायाविरुद्ध लढणारे महान समाजप्रबोधक होते. अवघ्या दीड दिवसांचे औपचारिक शिक्षण असूनही त्यांनी आपल्या जिद्द, कष्ट आणि प्रतिभेच्या बळावर अजरामर साहित्य निर्माण केले. त्यांच्या लेखणीतून शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला आणि वंचित समाजाच्या वेदना जगासमोर आल्या.”
ते पुढे म्हणाले, “आजच्या पिढीने अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचून समता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. महामानवांच्या जयंती केवळ मिरवणुका, डीजे किंवा दिखाव्यासाठी नसून त्या समाजप्रबोधन, शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना मदत आणि विधायक सामाजिक उपक्रमांद्वारे साजऱ्या व्हायला हव्यात. ‘नाचण्यापेक्षा वाचण्याची संस्कृती’ जोपासणे ही काळाची गरज असून महापुरुषांचे विचार कृतीत उतरवणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते उदय काळभोर, संजय भालेराव, शिवसेना नेते संतोष भोसले, महेश जैनजांगडे, रमेश भोसले, सूर्यकांत आप्पा गवळी, श्रीकांत ओव्हाळ, ॲड. सुजित कांबळे, पंढरीनाथ नामुगडे, सूर्यकांत काळभोर, राहुल जोगदंड, शिवाजी काळभोर यांच्यासह ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालेय साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षण आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Editer sunil thorat







