श्रावणासाठी भुलेश्वर मंदिरात प्रशासन सज्ज ; गर्दी, पार्किंग, सुरक्षेचे नियोजन, मात्र अन्न प्रशासन कुठे?
गर्दी, व्हीआयपी दर्शन, पार्किंग आणि सुरक्षेवर बैठकीत चर्चा; भेसळखोरांवर कारवाईचा दावा करणाऱ्या विभागाच्या अनुपस्थितीने प्रश्नचिन्ह
माळशिरस (ता. पुरंदर) : पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध भुलेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, दर्शन व्यवस्था, व्हीआयपी दर्शन तसेच मंदिर परिसरातील आवश्यक सोयी-सुविधांचे नियोजन करण्यासाठी माळशिरस ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता भुलेश्वर मंदिर परिसरात प्रशासकीय बैठक घेण्यात आली.
श्रावण महिन्यात दर सोमवारी तसेच विशेष धार्मिक दिवसांमध्ये भुलेश्वर मंदिरात हजारो भाविक दाखल होण्याची शक्यता असल्याने गर्दीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन
मंदिर परिसरात अचानक होणारी गर्दी, वाहनांची वाढती संख्या आणि दर्शनासाठी लागणाऱ्या रांगा यामुळे भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
पास व्यवस्था, व्हीआयपी दर्शनासाठी स्वतंत्र नियोजन, पार्किंगची शिस्तबद्ध व्यवस्था आणि गर्दीच्या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ तैनात करण्यावर पोलिस प्रशासनाने विशेष भर दिला. मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दल अथवा इतर अत्यावश्यक वाहनांना मार्ग उपलब्ध राहावा, याबाबतही नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
गर्दीच्या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग, वाहनतळ, दर्शन रांगा तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
वन, पुरातत्त्व, महसूल आणि ग्रामपंचायतीची जबाबदारी
भुलेश्वर मंदिर परिसराचा ऐतिहासिक तसेच धार्मिक वारसा लक्षात घेता वनविभाग आणि पुरातत्त्व विभागाची भूमिकाही महत्त्वाची आहे. मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण किंवा पर्यावरणाला बाधा निर्माण होणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी सतर्क राहण्याची आवश्यकता बैठकीत व्यक्त करण्यात आली.
तसेच महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि इतर संबंधित यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात, अशा सूचना करण्यात आल्या.
बैठकीस माळशिरस ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, यवत पोलीस ठाण्याचे अधिकारी, वनविभाग, महसूल विभाग तसेच मल्टीटास्किंग टास्क फोर्सचे अधिकारी उपस्थित होते.
मात्र अन्न प्रशासनाची अनुपस्थिती; नेमकी जबाबदारी कोणाची?
श्रावण महिन्यात भुलेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. भाविकांच्या सुरक्षेबरोबरच त्यांना विक्री करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ हा देखील अत्यंत गंभीर विषय आहे.
मात्र, एवढ्या महत्त्वाच्या नियोजन बैठकीत अन्न व औषध प्रशासनाच्या प्रतिनिधींची उपस्थिती नसल्याने आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
मंदिर परिसरात श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर प्रसाद, खाद्यपदार्थ, पेये, पॅकबंद पदार्थ तसेच इतर खाद्यवस्तूंची विक्री होण्याची शक्यता आहे. अशावेळी खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासणे, संशयास्पद अथवा भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई करणे, विक्रेत्यांची तपासणी करणे आणि भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे.
‘भेसळखोरांना दणका’ मग भुलेश्वरमध्ये तपासणी कधी?
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाकडून घेतली जात असताना, भुलेश्वरसारख्या मोठ्या धार्मिक स्थळी श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच अन्न प्रशासनाच्या पातळीवर ठोस नियोजन का दिसून आले नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
गर्दी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासन, पर्यावरण व परिसराच्या दृष्टीने वनविभाग, ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणासाठी पुरातत्त्व विभाग आणि स्थानिक व्यवस्थेसाठी ग्रामपंचायत अशा विविध यंत्रणा नियोजनासाठी एकत्र आल्या. मग भाविकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या अन्न प्रशासनाला या बैठकीपासून दूर का ठेवण्यात आले? हा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे.
श्रावणभर धडक कारवाई होणार का?
श्रावण महिन्यात भुलेश्वर मंदिर परिसरात खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांची, हॉटेलची, स्टॉलची आणि इतर खाद्यविक्रेत्यांची तपासणी केली जाणार का? खाद्यतेलाचा दर्जा, पाणी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, प्रसाद तसेच पॅकबंद खाद्यपदार्थांची तपासणी होणार का? नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई होणार की परवानेही तपासले जाणार? याचे उत्तर अन्न प्रशासनाने देणे गरजेचे आहे.
श्रावण हा केवळ धार्मिक उत्सव नसून लाखो भाविकांच्या श्रद्धेशी आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित काळ आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ बैठका घेऊन थांबण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाई करण्याची गरज आहे.
आता श्रावण महिन्यात भुलेश्वर मंदिर परिसरात अन्न व औषध प्रशासन किती तपासण्या करणार, किती नमुने घेणार, किती विक्रेत्यांवर कारवाई करणार आणि भेसळ आढळल्यास किती कठोर पावले उचलणार, याकडे भाविकांसह स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गर्दी नियंत्रणाचे नियोजन झाले; सुरक्षेचे नियोजन झाले; पार्किंग आणि दर्शन व्यवस्थेवर चर्चा झाली. आता प्रश्न एकच — भाविकांच्या ताटातील अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी अन्न प्रशासनाचे नियोजन कधी होणार?
Editer sunil thorat



