स्वप्नील कुंजीर यांची मागणी; SIR मोहिमेत एकही मतदार वंचित राहू नये, अंतिम तीन दिवस विशेष सुविधा केंद्र सुरू करा…
SIR मोहिमेत एकही मतदार वंचित राहू नये; अंतिम तीन दिवस विशेष सुविधा केंद्र सुरू करण्याची शिवसेनेची मागणी...

हवेली (पुणे) : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेदरम्यान कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाऊ नये, या उद्देशाने मोहिमेच्या अंतिम तीन दिवसांत प्रत्येक गावात विशेष सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे हवेली तालुका अध्यक्ष स्वप्नील सुमनताई वसंतराव कुंजीर पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेंतर्गत बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. मात्र, हवेली तालुक्यातील अनेक नागरिक नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच इतर कारणांमुळे दिवसभर घराबाहेर असतात. अनेक कुटुंबे भाड्याच्या घरात राहत असल्याने त्यांचे वारंवार स्थलांतर होत असते. त्यामुळे BLO घरी भेट देऊनही अनेक पात्र मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी होऊ शकत नाही. परिणामी, त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची किंवा आवश्यक नोंदणी अपूर्ण राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
यावर उपाय म्हणून SIR मोहिमेच्या समाप्तीपूर्वीचे अंतिम तीन दिवस प्रत्येक गावात किंवा संबंधित कार्यक्षेत्रात जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी विशेष सुविधा केंद्र सुरू करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. या केंद्रांवर संबंधित BLO दिवसभर उपस्थित राहतील, अशी व्यवस्था केल्यास ज्या मतदारांचे पुनर्निरीक्षण राहून गेले आहे, त्यांना स्वतः उपस्थित राहून आवश्यक अर्ज भरता येतील, आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील आणि त्यांची पडताळणी पूर्ण करता येईल.
शिवसेनेच्या वतीने असेही नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने अंतिम टप्प्यात विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांची गैरसोय टळेल आणि कोणताही पात्र मतदार मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहणार नाही.
यासंदर्भात प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक आदेश जारी करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
“एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाऊ नये, यासाठी अंतिम तीन दिवस विशेष सुविधा केंद्र सुरू करून नागरिकांना संधी देणे ही काळाची गरज आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी,” अशी भूमिका शिवसेनेचे हवेली तालुका अध्यक्ष स्वप्नील सुमनताई वसंतराव कुंजीर पाटील यांनी मांडली.
Editer sunil thorat



