
आळंदी म्हातोबा (ता. हवेली) : भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान हे समाजाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या त्यागाची आठवण भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने आळंदी म्हातोबा येथे शहीद संतोष खटाटे यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी हवेली तालुका पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद संतोष खटाटे यांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, संतोष मुरकुटे, प्रकाश वाल्हेकर, भगवान जवळकर, कैलास खटाटे, जनार्दन खटाटे, माऊली जवळकर, प्रकाश जवळकर, मोहन जवळकर, कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदू पाटील काळभोर, पंचायत समितीच्या माजी सभापती सपनाताई वाल्हेकर, शंकर जवळकर, नानासाहेब भोंडवे, दत्तात्रय जवळकर, दयानंद शिवरकर, दिलीप गायकवाड, डॉ. बनसोडे, रतन झेंडे, भगवान तापकीर, पारस वाल्हेकर, सुनील चोरघे यांच्यासह ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दिलीप वाल्हेकर यांनी शहीद संतोष खटाटे यांच्या बालपणापासूनच्या जीवनप्रवासाचा आढावा घेत त्यांच्या देशसेवेची प्रेरणादायी कहाणी सांगितली. कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदू पाटील काळभोर यांनी शहीद जवानांचे योगदान कायम स्मरणात ठेवणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे सांगत त्यांच्या बलिदानातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
शहीद संतोष खटाटे यांच्या पुतणी कु. ऋतुजा महेश खटाटे यांनी आपल्या शहीद काकांच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. त्यांच्या भावनिक शब्दांनी उपस्थित ग्रामस्थ आणि मान्यवर भारावून गेले.
सभापती युवराज काकडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक शहीद जवानाचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे.” हवेली तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत शहीद जवानांची कुटुंबे आहेत, त्या प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय शहीद संतोष खटाटे यांच्या स्मरणार्थ गावातील एखाद्या रस्त्याला किंवा सार्वजनिक वास्तूला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येईल, तसेच त्यांच्या स्मारक कमानीचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुढील स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचाही संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन शहीद संतोष खटाटे यांचे बंधू शहाजी खटाटे यांनी केले. गेली सलग २५ वर्षे ते आपल्या शहीद भावाच्या स्मृती जागविण्याचे कार्य निष्ठेने करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूसाहेब लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन गणेश जवळकर यांनी केले.
२५ वर्षांची अखंड स्मृती जपण्याचा संकल्प
शहीद संतोष खटाटे यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या २५ वर्षांपासून दरवर्षी स्मृतिदिनाचे आयोजन करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या उपक्रमामुळे शहीदांच्या बलिदानाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचत असून गावात देशभक्तीची भावना अधिक दृढ होत आहे.
Editer sunil thorat






