8 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज ; नदी-नाले वाहणार, पंजाबराव डख यांचा दिलासादायक दावा…

मुंबई : जून महिना संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर काही दिवस पाऊस झाला, मात्र त्यानंतर त्याची गती मंदावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आता मात्र भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजासोबतच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनीही राज्यासाठी दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे.
पंजाबराव डख यांच्या मते, 21 जून ते 30 जून या कालावधीत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस राज्यभर एकाचवेळी न होता टप्प्याटप्प्याने विविध भागांत बरसणार असून विदर्भातून त्याची सुरुवात होईल. त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि इतर भागांत मान्सून सक्रिय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डख यांच्या अंदाजानुसार, पुढील आठ दिवस राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे कोरडे पडलेले नदी-नाले, ओढे आणि जलसाठे पुन्हा भरून वाहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतीसाठी आवश्यक ओलावा निर्माण होऊन खरीप हंगामाला मोठा आधार मिळणार आहे.
शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला…
पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना पेरणीबाबत घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. शेतातील जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यानंतरच पेरणी करावी. केवळ वरवरची ओल असल्यास पेरणी टाळावी, तर योग्य प्रमाणात ओलावा असल्यास पेरणीस सुरुवात करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
यंदा राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नसून परतीचा पाऊसही समाधानकारक राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा अंदाज दिलासादायक ठरत आहे.
Editer sunil thorat



