टीम इंडियाला झटका! स्टार अष्टपैलू श्रेयंका पाटील वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची शक्यता…

नवी दिल्ली : वुमेन्स टी-20 वर्ल्डकपमध्ये सलग दोन विजयांसह दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संघाची प्रमुख अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात गंभीर दुखापतग्रस्त झाली असून तिच्या घोट्याच्या लिगामेंटला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ती स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय संघाने बुधवारी नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात सर्वच विभागांत वर्चस्व गाजवत 95 धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळी करत 20 षटकांत 209 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडचा संपूर्ण संघ 114 धावांवर गारद झाला आणि भारताने स्पर्धेतील सलग दुसरा विजय साजरा केला.
मात्र या विजयाला दुखापतीचे गालबोट लागले. नेदरलँडच्या डावातील सहावे षटक टाकण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने श्रेयंका पाटीलला गोलंदाजीसाठी पाचारण केले होते. षटकातील पहिल्याच चेंडूवर फलंदाजाने शॉर्ट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू अडवण्यासाठी श्रेयंका स्वतःच पुढे धावत गेली, मात्र त्यावेळी तिचा तोल गेला आणि तिचा घोटा वाकला. या घटनेनंतर ती वेदनेने मैदानावर कोसळली.
श्रेयांकाला तातडीने वैद्यकीय मदत देण्यासाठी फिजिओ मैदानात दाखल झाले. काही मिनिटे उपचार करूनही तिला उभे राहणे किंवा चालणे शक्य झाले नाही. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला स्ट्रेचरच्या सहाय्याने मैदानाबाहेर नेण्यात आले. या घटनेमुळे मैदानावरील खेळाडू आणि भारतीय चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
सामन्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत तिच्या घोट्याच्या लिगामेंटला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारच्या दुखापतीत खेळाडूला काही आठवडे विश्रांतीची आवश्यकता असते. त्यामुळे श्रेयंका पाटील वर्ल्डकपच्या उर्वरित सामन्यांत खेळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे बोलले जात आहे. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
श्रेयंका पाटील ही भारतीय महिला संघातील महत्त्वाची अष्टपैलू खेळाडू मानली जाते. मधल्या षटकांमध्ये प्रभावी गोलंदाजी करण्याबरोबरच ती आवश्यक वेळी फलंदाजीतही योगदान देते. तिच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या संतुलनावर परिणाम होण्याची शक्यता असून आगामी सामन्यांमध्ये संघ व्यवस्थापनाला नवी रणनीती आखावी लागणार आहे.
दरम्यान, श्रेयांकाच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी दिली जाणार याबाबत क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघाने स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी अनुभवी आणि उपयुक्त अष्टपैलू खेळाडूची उणीव संघाला जाणवू शकते.
सलग दोन विजयांमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असला, तरी श्रेयंका पाटीलच्या दुखापतीमुळे संघाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. आता तिच्या फिटनेस अहवालाकडे आणि बीसीसीआयच्या अधिकृत निर्णयाकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat






