“मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नेपाळपेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते”; निखिल वागळे यांचा दावा

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर, राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत सरकारवर गंभीर आरोप केले.
वागळे यांच्या मते, दिल्लीतील लोकसभेकडे निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चादरम्यान निर्माण झालेला गोंधळ विद्यार्थ्यांमुळे नव्हे, तर पोलिसांच्या कारवाईमुळे झाला. दगडफेक व हिंसाचार करणारे विद्यार्थी नसून त्यामागे पोलिसांची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे विद्यार्थ्यांवर नव्हे, तर पोलिसांवर जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या टीकेचाही वागळे यांनी समाचार घेतला. विद्यार्थ्यांना देशद्रोही म्हणणे अयोग्य असल्याचे सांगत, इतिहासातील अनेक सामाजिक व राजकीय परिवर्तनांमध्ये तरुणांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी नमूद केले.
वागळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनातील सहभागाचाही उल्लेख करत, त्यांनी उशिरा का होईना पण आंदोलनात सहभाग घेतला, हे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना पाठिंबा देताना वागळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मागण्या वेळेत मान्य झाल्या नाहीत तर परिस्थिती नेपाळपेक्षाही गंभीर होऊ शकते. तसेच मुंबईत लागू करण्यात आलेल्या जमावबंदीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवरही कठोर टीका केली. देशातील शिक्षण, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न आता केंद्रस्थानी आले असून, जनतेत असंतोष वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, हे सर्व विधान निखिल वागळे यांनी एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केलेली त्यांची वैयक्तिक मते असून, संबंधित आरोपांवर अधिकृत यंत्रणांची भूमिका स्वतंत्रपणे समोर येणे अपेक्षित आहे.
Editer sunil thorat



