जिल्हाशिक्षणसामाजिक

पस्तीस वर्षांनंतर पुन्हा उजळल्या शालेय आठवणी; चिंतामणी विद्यामंदिर १९९०-९१ बॅचचा भव्य स्नेहमेळावा उत्साहात…

थेऊर : काळाच्या ओघात अनेक ऋतू बदलतात, आयुष्याच्या वाटा वेगळ्या होतात; मात्र शालेय जीवनात जुळलेली मैत्री आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार हे आयुष्यभर सोबत राहतात. याच मैत्रीच्या चिरंतन नात्याला नव्याने उजाळा देणारा चिंतामणी विद्यामंदिर, थेऊर येथील इयत्ता दहावी सन १९९०-९१ बॅचचा भव्य स्नेहमेळावा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.

तब्बल ३५ वर्षांनंतर आयुष्याच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र आले. अनेक जण इंजिनिअर, डॉक्टर, वकील, शिक्षक, पोलीस अधिकारी, पत्रकार, उद्योजक तसेच आधुनिक शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असले तरी मैत्रीचा धागा मात्र आजही तितकाच घट्ट असल्याचे या मेळाव्यात प्रकर्षाने जाणवले.
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पवित्र श्री चिंतामणीच्या नगरीतील आशीर्वाद बँक्वेट हॉल येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. त्याआधी सर्व माजी विद्यार्थी आपल्या लाडक्या चिंतामणी विद्यामंदिराच्या परिसरात एकत्र जमले. शाळेच्या प्रवेशद्वारातून पुन्हा आत प्रवेश करताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता, आनंद आणि जुन्या आठवणींची भावनिक छटा दिसून येत होती. वर्गखोल्या, पटांगण आणि शाळेच्या भिंती पाहताच जणू काळ मागे फिरल्याचा अनुभव सर्वांनी घेतला.

अरे, तू तोच ना...!” या एका हाकेने ३५ वर्षांचे अंतर क्षणात विरघळून गेले. शालेय जीवनातील खोड्या, शिक्षकांच्या शिक्षा, सहली, खेळ आणि निरागस आठवणींना उजाळा मिळताच वातावरणात आनंदाचा जल्लोष पसरला.

या स्नेहमेळाव्याला विद्यार्थ्यांना घडविणारे अनेक आदरणीय गुरुजन उपस्थित होते. चौधरी सर, वनारसे सर, सय्यद सर, महारनवर सर, बांगर सर, शेलार सर, आहिरे सर, सोकटे सर, गायकवाड सर, काकडे सर, नेवाळे सर, मुल्ला मॅडम आणि वनारसे मॅडम यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. गुरुजनांच्या चेहऱ्यावर वयाची रुपेरी किनार असली तरी विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम आणि आपुलकी पूर्वीइतकीच जिवंत असल्याचे दिसून आले.

विशेष आकर्षण ठरले ते महारनवर सरांचे. हातात छडी घेऊन उपस्थित झालेल्या सरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही छडी शिक्षा देण्यासाठी नव्हती, तर शाळकरी जीवनाच्या गोड आठवणींना उजाळा देणारी होती.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या सायन्स हॉलमध्ये सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करून झाली. गुरुजन सभागृहात दाखल होताच विद्यार्थ्यांनी एकसुरात दिलेली “एकसाथ नमस्ते…” ही हाक ऐकून अनेक शिक्षकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

मित्रवर्य पुष्पराज गुप्ता यांनी स्वागतपर भाषण केले, तर चंद्रविलास गव्हाणे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. यावेळी दिवंगत शिक्षकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याच कार्यक्रमात वर्गमित्र ज्ञानेश्वर चंद यांची कन्या कु. गायत्री हिने एमपीएससीमार्फत पीएसआय प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल तिचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच वर्गमैत्रीण संगीता कांबळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या गौरवक्षणांनी संपूर्ण बॅचचा अभिमान उंचावला.

आशीर्वाद बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या ओळख परेडमध्ये प्रत्येकाने स्वतःचा जीवनप्रवास सांगितला. यावेळी शालेय जीवनातील भन्नाट किस्से, खोड्या आणि आठवणींनी वातावरणात हास्यकल्लोळ निर्माण झाला. मात्र आपल्यात नसलेल्या मित्रांची आठवण काढताना अनेकांचे डोळे पाणावले आणि सभागृह काही क्षण स्तब्ध झाले.

मित्रवर्य सर्जेराव म्हस्के यांनी हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त करत मैत्री, कृतज्ञता आणि जीवनमूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर सर्व गुरुजनांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणातून गुरुजनांनी माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्ट आणि मैत्री जपण्याचा संदेश दिला.

यावेळी सलिम मणेरी यांनी महारनवर सरांना त्यांच्या उत्तम प्रकृतीचे रहस्य विचारले असता सरांनी दिलेले उत्तर सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. “आनंदाने जगा, स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःवर प्रेम करा आणि आहे त्यात समाधान माना; आनंदी मन हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे,” हा त्यांचा संदेश उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.

यानंतर सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमात चंद्रविलास गव्हाणे यांनी “आने से उसके आये बहार”, “हवा हवा ये हवा” आणि “झिंगाट” ही गीते सादर केली. या गीतांच्या तालावर गुरुजनांसह सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. विशेषतः ऐंशी वर्षांचा टप्पा पार केलेल्या चौधरी सर आणि वनारसे सरांचा उत्साह पाहून उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन चंद्रविलास गव्हाणे आणि करुणा कंद मॅडम यांनी केले.

निरोपाचा क्षण मात्र अत्यंत भावनिक ठरला. चंद्रविलास गव्हाणे यांनी कविवर्य अनंत राऊत यांची “दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…” ही कविता सादर करताच वातावरण भारावून गेले. सहा-सात तास जुन्या आठवणींच्या विश्वात रमलेले मित्र निरोप घेताना भावूक झाले. प्रत्येकाच्या डोळ्यांत भेटीचा आनंद आणि पुन्हा विभक्त होण्याची हुरहूर स्पष्ट दिसत होती.

यावेळी जयवंत महारनवर यांनी येत्या दिवाळीत कर्जत येथे पुन्हा अशाच स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला. या प्रस्तावाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

हा स्नेहमेळावा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर मैत्रीचा उत्सव, गुरुजनांप्रती कृतज्ञतेचा भाव, आठवणींचा सुगंध आणि आयुष्यभर जपलेल्या नात्यांचा अविस्मरणीय सोहळा होता. पस्तीस वर्षांनंतरही मैत्रीचे बंध तितकेच घट्ट, निखळ आणि चिरंतन राहू शकतात, याचे सुंदर उदाहरण या स्नेहमेळाव्याने घालून दिले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??