पाणी संवर्धन ही काळाची गरज; जेएसपीएमच्या जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत जनजागृती उपक्रम…

हडपसर (पुणे) : वाढती लोकसंख्या, अनियमित पर्जन्यमान आणि भूजल पातळीतील घट यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये पाणी संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जेएसपीएमच्या जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, हडपसर येथे दि. २५ जुलै २०२६ रोजी ‘पाणी संवर्धन उपक्रम‘ उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमाला संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे, डॉ. मारुती काळबांडे तसेच डिप्लोमा फार्मसीचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य असल्याचे सांगत, पाणी वाचविणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले.
उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरात राबविण्यात येणाऱ्या विविध पाणी संवर्धन प्रक्रियांची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. पर्जन्यजल संधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रणालीचे कार्य, त्यामागील वैज्ञानिक संकल्पना तसेच पावसाचे पाणी साठवून त्याचा भूजल पुनर्भरणासाठी आणि विविध उपयोगांसाठी कसा प्रभावी वापर करता येतो, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पाणी संवर्धन ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. घर, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले. भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी पर्जन्यजल संधारणासारख्या उपाययोजनांचा व्यापक अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले.
याशिवाय विद्यार्थ्यांनी विविध परिसरांना भेटी देऊन नागरिकांमध्ये पाणी संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा संदेश दिला. पाण्याच्या योग्य वापराबाबत जनजागृती करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.
या उपक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रा. निकिता कोलते यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच डॉ. रविराज जाधव, प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. चेतन मामडगे, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, विवेक थोरात, स्वाती माकोने, रुपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पांडुरंग पवार, आकांक्षा जाधव आणि ज्योती रणधिरे यांनी उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मोलाचे सहकार्य केले.
महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पाणी संवर्धनाबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला असून, जलसंधारणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
Editer sunil thorat





